अस्मितेच्या शिळ्या खिचडीचे ‘कॉम्बो मिल…’
Articlesदुपारची वेळ... हॉटेलमध्ये निरनिराळ्या पदार्थांचे सुवास दरवळत होते. गिऱ्हाईकांची गर्दी ओसंडून वाहत होती. तेवढ्यात एका न्यूज चॅनेलची 'ओव्हर-एक्सायटेड' अँकर हातात मोठा बूम आणि मागे धापा टाकणारा कॅमेरामन घेऊन हॉटेलमध्ये शिरली. अँकर- मुंबईचा खवैय्या फार चोखंदळ असतो. त्याला वाफाळलेली मिसळ कधी खावी, कोणाकडची खावी आणि झणझणीत वडापाव कुठल्या एरियात कोणाकडे चांगला मिळतो, याची इत्यंभूत माहिती असते. सध्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे ‘ठाकरे ब्रदर्स’ एकत्र येण्याचे संकेत मिळत आहेत, ते पाहून वाटतंय की मुंबईच्या राजकीय किचनमध्ये एक विचित्र 'फ्युजन डिश' तयार करण्याची तयारी सुरू झाली आहे. ज्या दोन भावांनी वर्षानुवर्षे एकमेकांच्या रेसिपीला ‘अळणी’ म्हटलं, तेच आता एकत्र येऊन मुंबईकरांना ‘झणझणीत मराठी ताट’ वाढायला निघालेत. पण या डिशचा वास मात्र काहीसा ‘स्वार्थी’ येतोय. "नमस्कार! मुंबई महापालिकेचा बिगुल वाजलाय आणि ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा आता घराघरातून थेट हॉटेलच्या टेबलपर्यंत पोहोचली आहे. चला तर मग, जाणून घेऊया काय वाटतंय मुंबईच्या खवैय्यांना या 'महारोजगार' युतीबद्दल!" अँकर धावत एका कोपऱ्यात बसलेल्या एका वयस्कर काकांकडे गेली, जे शांतपणे पिठलं-भाकरी ओरपत होते. अँकर: "काका, ठाकरे बंधू एकत्र येत आहेत! जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरतोय. तुम्हाला काय वाटतं, या युतीमुळे मुंबईचा चेहरा बदलेल?" काका: (घास गिळत मिश्किलपणे) "बघ पोरी, हे हॉटेलमध्ये कसं असतं, मालक बदलला तरी चव तीच राहिली पाहिजे… इथे तर जुन्या मालकानेच मुंबईची चव पार बिघडवलीय… त्यात हॉटेल चालेनासं झालंय म्हणून त्याने अजून एक नवीन पार्टनर घेतलाय… म्हणजे काय तर फक्त दोन जुन्या शेफनी एकत्र येऊन नवीन 'फ्युजन' बनवायचा घाट घातलाय. गेल्या ३० वर्षांपासून याच 'खानावळी'ची चावी यांच्याकडे होती, तेव्हा मुंबईकरांना खड्ड्यांची चटणी आणि गढूळ पाण्याचा रस्साच मिळत होता ना? अँकर थोडी ओशाळली आणि लगेच दुसऱ्या टेबलकडे वळली- तिथे एक जाडसर मस्तमौला गृहस्थ मिसळीवर ताव मारत होते… अँकर त्यांच्याकडे जाऊन त्यांची प्रतिक्रिया घेऊ लागली- दादा तुम्हाला या दोन भावांच्या युतीबद्दल काय वाटतंय… दादा- हे दोन्ही ब्रँड्स आता ‘ओव्हररेटेड’ वाटू लागले आहेत. एकेकाळी ज्यांच्या भाषणाची फोडणी ऐकायला मुंबईकर गर्दी करायचे, त्यांच्याकडे आता तोच जुना मेनू उरला आहे. एका बाजूला सत्तेचा मलिदा संपलेला ‘मोठा मालक’ आणि दुसऱ्या बाजूला नवीन गिऱ्हाईक न मिळाल्यामुळे दुकान पडलेलं ‘धाकटा मालक’. हे दोन्ही शेफ जेव्हा एकत्र येण्याची भाषा करतात, तेव्हा ते मुंबईचा उद्धार करायला नाही, तर आपली जुनी ‘जहागीरदारी’ असलेली खानावळ वाचवायला एकत्र येत आहेत. ग्राहकाला (मुंबईकराला) आता जुन्या चवीचा कंटाळा आलाय, त्याला ‘डेव्हलपमेंट’चा फ्रेश तडका हवाय. अँकर तिसऱ्या टेबलवर एका मध्यमवर्गीय नोकरदार महिलेकडे वळली… आणि विचारलं तुम्हाला काय वाटतं… नोकरदार महिला- मुंबई महानगरपालिका म्हणजे या दोन्ही भावांसाठी जणू काही ‘आशियांतील सर्वात मोठं अन्नछत्र’ आहे. गेल्या कित्येक दशकांपासून या महापालिकेची ‘कन्फेक्शनरी’ एकाच कुटुंबाच्या ताब्यात होती. मलिदा कोणाला द्यायचा आणि बिर्याणी कोणामध्ये वाटायची, याचे सर्व अधिकार एकाच किचनमध्ये सुरक्षित होते. आज जेव्हा महापालिकेच्या तिजोरीची किल्ली हरवण्याची भीती वाटू लागली, तेव्हा भावांना भावांच्या प्रेमाचा उमाळा आला. हा विकास नाही, तर ही ‘हॉटेलचा गल्ला’ पुन्हा एकदा आपल्याच कपाटात कसा येईल, यासाठी रचलेलं हे राजकीय ‘फ्युजन’ आहे. अँकरला एकही पॉझिटीव्ह प्रतिक्रिया सापडेना म्हणून ती एका आजोबांकडे आली. तिला वाटलं हे एकदम निष्ठावंत शिवसैनिक असतील. म्हणून तिने त्यांना मत विचारलं- आजोबा- राजकारणाच्या या हॉटेलमध्ये जेव्हा जेव्हा मंदी येते, तेव्हा तेव्हा ‘मराठी अस्मितेचा’ शिळा मसाला बाहेर काढला जातो. ज्या भावांनी मुंबईच्या रस्त्यांचे खड्डे आणि पावसाचं पाणी यावर कधीच चविष्ट उपाय दिले नाहीत, ते आता पुन्हा एकदा ‘मराठी माणसाला जागं करण्याचं’ चूर्ण विकू लागले आहेत. पण मुंबईकर खवैय्या आता शहाणा झाला आहे. त्याला ठाऊक आहे की, ही युती म्हणजे प्रेमाची ‘मिठाई’ नसून केवळ सत्तेची ‘भजी’ तळण्यासाठी पेटवलेली चूल आहे. त्यांचं मत ऐकून चक्रावलेली अँकर एका उच्चशिक्षित कुटुंबीय बसलेल्या टेबलकडे वळली आणि तिने त्यांच्यासमोर बुम माईक धरून त्यांचं मत विचारलं…. महिला- हे मर्जर म्हणजे ‘कॉर्पोरेट कॅटरिंग’ विरुद्ध ‘फॅमिली डायनिंग’ एकीकडे मुंबईला जागतिक दर्जाचं शहर बनवण्यासाठी नवे प्रकल्प आणि इन्फ्रास्ट्रक्चरचा तडका दिला जातोय, तर दुसरीकडे ठाकरे बंधू अजूनही ‘आमची जुनी चवच कशी भारी’ या भ्रमात आहेत. हे मर्जर म्हणजे दोन बुडत्या रेस्टॉरंट्सनी एकत्र येऊन काढलेली नवी ‘फ्रँचायझी’ वाटत आहे. पण या फ्रँचायझीमध्ये ना नवीन व्हिजन आहे, ना नवीन डिश. आहे तोच जुना तक्रारीचा पाढा आणि ‘आम्हीच मुंबईचे मालक’ हा अहंकार. अखेर अँकरने आपला मोर्चा तात्यांकडे वळवला. तात्या म्हणजे हॉटेलचे मालक- अँकर: "तात्या, तुम्ही इतकी वर्ष हॉटेल चालवताय. या युतीमुळे राजकारणातली त्यांची 'मंदी' संपेल का?" तात्या: (चष्मा नीट करत) "पोरी, जेव्हा हॉटेलचा धंदा बसतो ना, तेव्हा मालक 'बाय वन गेट वन फ्री'ची स्कीम काढतो. ही युती म्हणजे तशीच एक स्कीम आहे. एका भावाचं 'इंजिन' वाफ सोडतंय आणि दुसऱ्याला त्याचा 'धनुष्यबाण' सांभाळता आला नाही…. , म्हणून आता दोघं एकत्र येऊन 'कॉम्बो मील' विकायला निघालेत. पण गिऱ्हाईक आता हुशार झालंय. त्याला माहिती आहे की, हे दोघं एकत्र आलेत ते मुंबईच्या 'किचन'मध्ये सुधारणा करायला नाही, तर स्वतःच्या गल्ल्यात भर टाकायला!" पण मुंबईकराने एक लक्षात घ्यायला पाहिजे- शेवटी प्रश्न येतो तो बिलाचा! या दोन्ही भावांच्या युतीचं राजकीय बिल पुन्हा एकदा मुंबईकरांनाच भरावं लागणार आहे का? BMC is not a family business #notafamilybusiness
Continue watching